जळगाव | विशेष विश्लेषण
जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असली, तरी अद्याप उमेदवारी कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत स्पष्टता नाही. मात्र, एक गोष्ट निश्चित आहे की महायुतीकडे असलेल्या प्रबळ संख्याबळामुळे ही जागा भाजपकडेच राहण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे खरी लढाई विरोधकांशी नसून भाजपमधील इच्छुकांमध्येच सुरू असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायत सदस्य व लोकनियुक्त नगराध्यक्ष असे सुमारे ६३० मतदार या निवडणुकीत मतदान करणार आहेत. त्यापैकी महायुतीकडे तब्बल ४७४ मतदार आहेत. त्यामुळे उमेदवारी मिळवणारा उमेदवार जवळपास विजयी मानला जात आहे. म्हणूनच पक्षांतर्गत लॉबिंग, संपर्क आणि राजकीय समीकरणांना वेग आला आहे.
महायुतीतील जागावाटपाच्या चर्चेत शिवसेनेकडून जळगावची जागा मागितली जाऊ शकते. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे पुत्र प्रताप पाटील यांचे नाव चर्चेत आले असले तरी भाजपचे जिल्ह्यातील प्रभावी मंत्री गिरीश महाजन, संजय सावकारे, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे तसेच स्थानिक आमदार-खासदार यांची ताकद पाहता ही जागा भाजप सहजासहजी सोडेल, अशी शक्यता कमी दिसते.
भाजपच्या दृष्टीने जळगाव हा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे विधान परिषदेसारख्या प्रतिष्ठेच्या जागेवर पक्ष स्वतःचा उमेदवार देण्यावरच भर देईल, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या कन्या डॉ. केतकी पाटील यांचे नाव सध्या सर्वाधिक चर्चेत आहे. वैद्यकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांचा प्रभाव लक्षात घेतला जात आहे. डॉ. उल्हास पाटील यांचे राज्यातील विविध पक्षांतील नेत्यांशी असलेले संबंधही त्यांच्या जमेची बाजू मानले जातात.
मात्र, भाजपमध्ये त्यांचा प्रवेश तुलनेने अलीकडचा असल्याने संघटनात्मक निष्ठा आणि पक्षासाठी केलेल्या कार्याचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. भाजपच्या पारंपरिक कार्यकर्त्यांमध्ये हा मुद्दा चर्चेचा विषय आहे.
उद्योजक आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेले नंदकुमार अडवाणी हेही उमेदवारीच्या शर्यतीत मजबूत दावेदार मानले जात आहेत. गेल्या काही वर्षांत त्यांनी भाजपमधील विविध नेत्यांशी जवळीक वाढविली आहे. सामाजिक संस्थांमधील सहभाग आणि संघटनात्मक संपर्क यामुळे त्यांचे नाव गांभीर्याने घेतले जात आहे.
विशेष म्हणजे, निवडणुकीच्या काळातच नव्हे तर विविध राजकीय घडामोडींमध्ये पडद्यामागे सक्रिय राहणारे अडवाणी आता प्रत्यक्ष राजकीय भूमिकेत येण्यास उत्सुक असल्याचे दिसून येते.
‘बेटी बचाव-बेटी पढाओ’ अभियानामुळे राज्यभर ओळख निर्माण करणारे डॉ. राजेंद्र फडके हे भाजपमधील जुने व निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. पक्ष संघटनेत दीर्घकाळ काम केलेल्या फडके यांचे नावही चर्चेत आहे.
मात्र, विधान परिषद निवडणुकीत केवळ कार्यकर्तृत्व नव्हे तर व्यापक राजकीय समीकरणे आणि मतदारांवरील प्रभावही महत्त्वाचा मानला जात असल्याने त्यांच्या नावाकडे नेतृत्व कोणत्या नजरेने पाहते, हे महत्त्वाचे ठरणार आहे.
पाचोरा येथील अमोल शिंदे यांचे नाव प्रत्येक वेळी चर्चेत येते. स्थानिक स्तरावर त्यांचे नेटवर्क मजबूत असल्याचे मानले जाते. मात्र, जिल्हास्तरावरील आणि राज्यस्तरावरील राजकीय समीकरणांमध्ये त्यांचे स्थान कितपत प्रभावी आहे, यावर त्यांची संधी अवलंबून राहील.
जळगावच्या राजकारणात मंत्री गिरीश महाजन यांना अनेकदा ‘संकटमोचक’ म्हणून संबोधले जाते. पक्षातील गुंतागुंतीची समीकरणे सोडविणे, निवडणूक व्यवस्थापन आणि नेतृत्वाशी असलेला थेट संपर्क यामुळे उमेदवारी प्रक्रियेत त्यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते.
स्थानिक नेत्यांचे अहवाल, संघटनात्मक अभिप्राय, आर्थिक व राजकीय क्षमता, निवडून येण्याची खात्री आणि भविष्यातील राजकीय उपयोगिता या सर्व बाबींचा विचार करून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे इच्छुकांची संख्या कितीही असली तरी अंतिम क्षणी संकटमोचकांचा आशीर्वाद आणि पक्षश्रेष्ठींची पसंती ज्याला लाभेल, त्याच्याच गळ्यात उमेदवारीची माळ पडण्याची शक्यता अधिक आहे.
सध्या तरी डॉ. केतकी पाटील आणि नंदकुमार अडवाणी यांची नावे सर्वाधिक चर्चेत असली तरी राजकारणात अंतिम क्षणापर्यंत काहीही निश्चित नसते. पक्षनिष्ठा, संघटनात्मक स्वीकारार्हता, आर्थिक क्षमता, निवडणूक जिंकण्याची शक्यता आणि वरिष्ठ नेतृत्वाचा विश्वास या पाच निकषांवर अंतिम उमेदवार ठरणार आहे.
त्यामुळे जळगावच्या राजकीय वर्तुळात एकच प्रश्न चर्चिला जात आहे — “संकटमोचकांचा आशीर्वाद नेमका कुणाला मिळणार?”
सूक्ष्मलोकच्या वृत्ताची दखल; प्रभाग क्र. १० मध्ये लिक्विड फवारणीसाठी आरोग्य विभागाची यंत्रणा सज्ज भडगाव, प्रतिनिधी…
प्रभाग क्र. १० मध्ये डास प्रतिबंधक फवारणीला आरोग्य विभागाचा हेतुपुरस्सर विलंब? नागरिकांमध्ये संताप भडगाव, प्रतिनिधी…
अंजनविहिरे ग्रामपंचायतीकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार भडगाव तालुक्यातील अंजनविहिरे येथील ग्रामपंचायत सदस्या ताईसो. रत्नाबाई जयवंत पाटील…
भडगाव तहसीलदार व पुरवठा निरीक्षकांची दस्त बनावट प्रकरणातून निर्दोष मुक्तता १६ वर्षांपासून सुरू असलेल्या खटल्याचा…
भडगाव तहसील कार्यालयाकडून महत्त्वाचे आवाहन तहसील कार्यालय भडगाव येथील संजय गांधी शाखेमार्फत सर्व केंद्र चालक…